अरबांच्या देशात !!!

अरबांच्या देशाची मजाच न्यारी… इथे दिसतात सगळीकडे बुरखेवाल्या बायका आणि पांढर्या वेशातील पुरुष… बायका खरंच सुंदर असतात, बार्बी डॉल सारख्या बाहुल्या दिसतात… बुरख्याच्या आत पक्कया मॉड असतात !!!! पण बुरखा मात्र घालतात आणि संस्कृति आपली जपतात…

पांढर्या डगल्यातले पुरूष… उंचपुरे आणि राकट असतात… डोक्यावर पांढरा रुमाल नि त्यावर काळी रिंग घालतात….  खिशात फेरारीची चाबी घेऊन फिरतात आणि दोन दोन बायका पण फिरवतात… :) (अर्थात लग्नाच्या !!!!)

इथे येण्याआधी खरंच प्रश्न पडला होता आपल्यालापण बाहेर पडताना खरंच बुरखा घालावा लागेल काय??? एकटीला बाहेर पडता येईल का???? पण ह्या अरबांच्या देशात तसा काही नियम नाही… एक्सपॅट्सला बुराखाच काय मिनी माइक्रोचे पण बंधन नाही !!!!

टाइम पास करायला इथे मॉलशिवाय  दुसरे साधन नाही… जे काही आहे ते सर्व मॉल आणि मोठमोठ्या  बिल्डिंग्स… पण तरी भावते ती इथली शांतता !!!! रस्त्यावर गडबड नाही गोंधळ नाही की सदा असणारा ट्रॅफिक जॅम नाही… अगदी गावात सुद्धा गाड्या ८०-१००  च्या स्पीडने धावतात मात्र स्पीड लिमिटचे बंधन अगदी काटेकोरपणे पाळतात !!!!

अरबांच्या देशात अशी आहे मजा… उन्हाळ्यात मात्र उन म्हणजे एक सजा… पाच-सहा महिने जास्त उन्हाचे सोडले तर बाकी वातावरण पण छान असते…  अगदी गुलाबी नाही तरी थंडीतही जान असते….

अरबांचा हा देश एकदा बघायला हरकत नाही… वाळवंटातून रेती तुडवत डेझर्ट सफारीची मजा घ्यायला हरकत नाही… वाळवंटातून दिसणारा सूर्यास्त समुद्रातून दिसणार्‍या सूर्यास्ता-इतकाच भावणार…. सगळीकडे रेतीच रेती का असेना पण त्यातले सौंदर्य नक्कीच  वेडावणार  !!!!!!

पुन्हा एकदा सुरूवात !!!

खूप दिवसात टाकलं  नाही काहीच ब्लॉगवर … खरं तर  कंटाळा… निव्वळ कंटाळा… हेच आणि हेच कारण आहे त्याचं … कितीतरी नोंदी अर्धवट लिहून पडल्यात… त्यांना  परत रिव्यू करून टाकावं  असं  बरेचदा मनात येऊन सुद्धा त्याचा मुहूर्त काही लावला नाही. जसं देववर श्रद्धा, विश्वास हे आतूनच असावं लागतं… नुसतं  दोन वेळ उदबत्ती लावून  पूजा केल्याने देव पावत नाही आणि मनातही  श्रद्धा उत्पन्न होत नाही तसंच काहीसं लिहिण्याचं पण आहे असं मला वाटतं.  मनातून लिहिण्याची इच्छा उत्पन्न झाल्याशिवाय, ती उर्मी आल्याशिवाय नुसतं ठरवून कितीही म्हटलं तरी लिहिता येत नाही… :|
 
आता इथे अबु-धाबीत येऊन चार महिने होऊन गेले… नोकरी मधून तात्पुरती सुट्टी घेतल्यावर निवांत वेळ मिळेल तेव्हा नक्की लिहु असं मनात हजारदा घोटून पण लिहिण्याला काही सुरूवात केली नाही…. सुरूवात केली नाही म्हणाण्यापेक्षा अर्धवट लिहून ते पूर्णत्वास नेलं नाही….
 
तर इतके दिवस रखडलेल्या कामाला अचानक सुरूवात करायला लावायला कामी आलाय एक पिक्चर, एक मूवी….. जो मला खरंच inspire करून गेलाय…. काही करायचं असेल तर ते आताच, वेळ नाही ही सबब किती दिवस चालवायची…  शेवटी…. “जिंदगी ना मिलेगी दोबारा …. !!!!!” …. खरंय ना :) :)

जरा मी जास्तच उशिरा बघितलाय हा सिनेमा… हे खरंय… पण काय करता… पिल्लू…. आता मोठा झालाय ना…. मस्ती पण वाढलीय….. खूप  दिवसांनी मिळालेला निवांतपणा आणि इथे अबु-धाबीला सोबत कुणीच नसल्यामुळे वाढलेली कामं :|   ह्या सगळ्यामुळे वेळ कुठे मिळाला पिक्चर बघायला पण…. तरी वेळात वेळ काढून बघितला हेही नसे थोडके !!!

त्यामुळे शेवटी ठरवलंच….. काही का असेना, छोटं मोठं जे असेल ते, जे वाटलं ते, जसं असेल तसं काही तरी खरडायचं ….. कारण…. “जिंदगी ना मिलेगी दोबारा “

आणि शेवटी   “वळवाचा पाऊस”   असाच येणार… अचानक ……….. नाही का :)

छोटीसी बात…

संध्याकाळी  नेहमीप्रमाणे  ६ :३०  च्या  बस  मध्ये  चढली … कधी नव्हे ते थोडं वेळेच्या आधी आल्यामुळे खिडकीजवळची जागा मिळाली. ह्याच खुशीत होती आणि बाजूलाही कोणी नव्हते. खाली एक मुलगी कुणाला तरी फोन लावायचा प्रयत्न करत होती आणि समोरची व्यक्ती कदाचित फोन उचलत नसल्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचा वैताग स्वच्छ दिसत होता.

इतक्यात ड्राइवर ने बस चालू केली आणि ती मुलगी त्रसलेल्या चेहर्यानेच बस मधे चढली. जागाही नेमकी माझ्याच बाजूला रिकामी होती. जागेवर स्थानापन्न होताच मघापासून लागत नसलेला ह्या बाईंचा फोन लागला.

“हं, हेलो, कुठे आहेस तू ????”  आवाज चढलेलाच होता
“…..”
“मी बसली आता ह्या बस मधे. “
“…..”
“मला आधी नाही सांगायचं का मग…!!!! “
“…..”

“अरे दोन मिनिटापूर्वी फोन उचलला असतास तर मी दुसऱ्या रूट ची बस नसती का पकडली!!!! आता काय फायदा??”  एव्हाना आवाज अजून वाढला होता.
“…..”
“आता सॉरी म्हणून काय फायदा!!!! माझ्या बाइक ची चावी थोडी मिळेल मला…”
फोन कट….

एकदम सगळं शांत झाल्यासारखं वाटलं मला. २-३  मिनिटं असेच शांततेत गेले… तोच मागून गाणं गुणगुणायचा आवाज ऐकू आला “सच केह रहा है दिवाना… दिल… दिल ना किसी से लगाना…” , मागे बसलेली मुलगी कानात एअर फोन टाकून जोरजोरात गाणं म्हणत होती. परत बाजूच्या पोरीचा फोन वाजला…

“बोल …”
“……”
“तू असा कसा करतोस???? एक तर मला आधी काहीच सांगितलं नाहीस…. मला कुठून कळेल मग हे सगळं ….”
“…..”
“मी जाईन पायी …”
“…..”
“मला कुणाची गरज नाही… मी जाईन पायी सांगितलं नं  ” ….. “मैने हर लम्हा जिसे चाहा जिसे पूजा, उसिने यारो मेरा दिल तोडा… तोडा, तन्हा…. तन्हा छोsssडा…” मागची मुलगी अजुन सूर लावत होती
“…..”
“नकोsss… . मी जाईन पायी…”
“….”
“तू खरंच काही कामाचा नाही. you are useless… “
“…..”
“मला काही नको सांगू आता.. ठेवू फोन”
“…”
“ठेवते..”

नशीब फोन तरी आपटला नाही रागाने…. माझ्या मनात येऊन गेलं. परत पाच मिनिटं असेच गेले शांततेत. खिडकीतूनही आता बरीच थंड हवा येत होती. मी खिडकी लावली. एव्हाना बाजूच्या पोरीचा राग पण थोडा शांत झालेला दिसत होता तोच फोन वाजला…

“हं …”
“….”
” जाईन मी पायी तिथून. जास्त दूर नाही माझं हॉस्टेल”
“….”
“हो खरच जाईन मी. तू काही काळजी करू नकोस…”
“….”
“हेच जर तू मला आधी सांगितलं असतं तर कशाला मी ह्या गाडीत बसले असते…”
“….”
“ह्मम्म्म, ठीक आहे”
“…”
“ठेवते मग आता फोन”

परत शांतता… मागची पोरगी पण जरा शांत झाली होती. मोबाइल मधे दुसरं गाणं शोधत होती बहुतेक. ह्या वेळी मात्र बराच वेळ झाला …. विसेक मिनिटं तरी निघून गेली…. अशीच. फोन परत वाजला…

“बोल नं..”
“….”
“नाही आता कसं येणं शक्य आहे. मी थकलीय खूप.”
“……”
“आता??  काही नाही. जेवण केलं की झोप …मस्त”
“….”
“हो जाणारेय ना”
“….”
“हो गाडीपन मस्त आहे आणि गाडीवाला  पण… :D ” ….. “पेहेला नशा पेहेला खुमार … नया प्यार हैं नया इंतजार…”  मागच्या मुलीचं गाणं बदललं होतं आता.

बाजुचीचा पण आवाज एकदम कमी झाला होता आता. काय बोलतेय हे मला पण ऐकू येईना.
“ओके, ठीकेय “
“….”
“हो…नक्की.. “……. “उसने बात की कुछ ऐसे रंग से…. सपने दे गया वो हजारो रंग के…”
“….”

माझा स्टॉप आला तरी फोन वर कुजबुज चालूच होती. उतरताना एकदा बघितले तिच्याकडे…. उमलणाऱ्या कळीसारखी भासत होती ती … आणि कानावर सूर पडत होते…”पेहेला नशा, पेहेला खुमार  … नया प्यार हैंsss …. नया इंतजारsss …….”

माझे खादाडीचे प्रयोग !!!!

नवीन नवीन लग्न झाल्यावर नव्या नवरीची कसोटी लागते ती पहिल्यांदा स्वयंपाक करताना……. आणि लग्नानंतरच पहिल्यांदाच स्वयंपाकघरात शिरलेल्या माझ्या सारख्यांची तर पार तारांबळ उडते !!!!!! माझ्या बाबतीत मात्र ह्याची सुरुवात पार लहानपणापासूनच झाली आहे. स्वयंपाक, भाज्या, धान्य ह्याच्याशी आपला काय संबंध ह्यावर शिक्कामोर्तब मी शाळेत असल्यापासून झाले आहे. साधारण दुसरीत असताना एकदा परीक्षेत प्रश्न होता  “भात कशाचा करतात?” तर मी चक्क ‘गव्हाचा !!!!!!!!!!!” असं उत्तर लिहून आले होते  … :D

वेगवेगळ्या डाळी ओळखणे हा परत एक फार मोठा प्रश्न असतो माझ्यापुढे !!!!! अगदी आत्ता आत्ता मला सगळ्या डाळी आणि त्यांची नावं समजायला लागली!!!!!!  तरीही अजूनही कधी कधी कॅणफुजन होतंच. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे साधारण दहावीत असताना एकदा स्वयंपाक करायचं  काम पडलं तेव्हा मी, माझी बहीण आणि एक आत्येबहीण असं तिघी मिळून तुरीच्या ऐवजी चक्क चण्याच्या डाळीचं वरण केलं होतं…. :D ……आणि सगळ्यानी ते चाविनी खाल्लं पण होतं !!!!!!

लहान असताना अजुन गोंधळात टाकणारा पदार्थ म्हणजे पालेभाज्या ओळखणे !!!!! मला आधी सगळ्या पालेभाज्या सारख्याच दिसायच्या….. एकदा आईनी पालक आणायला सांगितला तर मी शेपुची भाजी घेऊन आली होती…. :D

तर असे भाज्यांचे, डाळींचे अगम्य ध्यान असलेल्या माझ्यासारखीला लग्नानंतर जेव्हा प्रथमच सगळा स्वयंपाक करायची जबाबदारी पडली तेव्हा तारांबळ न उडाली तरच नवल !!!!!! बाकी स्वयंपाक बर्‍यापैकी करता येत असताना पहिल्या दिवाळीला सगळ्यात कठीण पदार्थ करायला घेतला…. अनरसे :| !!!!!! भल्या भल्या सुग्रणिना वाटेला लावणारा हा पदार्थ ….. त्याच्या समोर माझा काय टिकाव लागणार !!!!!!

तर दिवाळीला आईकडे गेली असताना तिने मला त्याचे तयार पीठ दिले. ते तिनेच तयार केले होते हे वेगळे सांगायला नको, आणि सांगितले की दुधात भिजवून छान रव्यावर थाप आणि नंतर तळून घे. मी म्हटलं ठीक आहे, करून तर बघू. एक दिवस नवरा ऑफीस मधे गेल्यावर ते पीठ बाहेर काढले आणि ठरवले की ऑफीस मधून आल्यावर त्याला गरमा गरम अनारस्याची ट्रीट द्यायची… :)

थोडसं पीठ काढून ठेवून एव्हडुसं पीठ मी परातीत घेतलं… छान त्या पिठाच आळ बनवलं… आणि त्या आळ्यात मावेल तेव्हड दूध त्यात ओतलं !!!!!!!!!!! आणि मनात एकदम खुश झाली कि  ….. माझे अनरसे बघा कसे मस्त होतील… नाही तर कुणी पाणी पण टाकत असेल कुणाला माहीत, मी तर मस्त भरपूर दूध घातलंय… :P

पण ह्या दुधानेच दगा दिला…. :( दूध झालं जास्त आणि पिठ झालं कमी…. म्हणून मग उरलेलं पीठ पण थोडं थोडं करत त्यात घातलं …. तरी ते पीठ काही दाद देईना…. ते खूपच आसट झालं….. शेवटी कसबसं थोडं घट्ट होताच त्याचे अनरसे थापायला घेतले….. होते नव्हते ते सगळे कौशल्य पणाला लावले……. अगदी गोल नाही पण त्याच्या जवळ जाणारे आकार जन्मास आले !!!!!!!!! खरी कसोटी लागली ते, अनरसे तळताना…  तुपात टाकल्याबरोबर ते पाण्यात रंग मिसळावा तसे विरघळत होते… :) आणि काही ठिकाणी लाल काही ठिकाणी पांढरे असे होत होते. शेवटी जरा चांगले झालेले प्लेट मधे काढले आणि नवरा आल्यावर त्यला खायला दिले…  त्यानी पण ते गोड मानून खाल्ले हे वेगळं सांगायला नको… :)   (लग्न नवीन असल्याचा परिणाम ….. :P )

असो, तर असा अनारस्याचा कार्यक्रम पार पडला आणि पुन्हा काही त्याच्या वाट्याला मी कधी गेली नाही, आईनी केलेले अनरसे गरमागरम खायचं काम मात्र इमान इतबारे पार पाडलं … :)

बरेचदा करून पण नेहमी काही ना काही होऊन फसणारा अजुन एक पदार्थ म्हणजे उपमा. कुणी म्हणेल कित्ती सोपा पदार्थ, ह्यात काही तरी बिघडण्यासारखं आहे का???? पण तरी हाही पदार्थ मला दाद देत नाही. कधी रवा कमी भाजण्यात येतो, कधी जास्त भाजला जातो, कधी पाणी जास्त होते तर कधी कमी…..  क्वचितच कधी तरी सगळंच छान होतं आणि आता आपल्याला छान उपमा करता येतो हा भ्रम परत दुसर्यांदा उपमा करताना खोटा ठरतो. आपलाच अति आत्मविश्वास आपल्यालाच भावतो…. :(

एकदा लग्नानंतर माहेरी गेली असताना मी आणि माझी बहीण दोघीच घरी होतो…. मस्त पाऊस पडायला लागला आणि डोळ्यासमोर भजी दिसायला लागली, बहीण म्हणाली ‘मस्त भजी खायची इच्छा होतेय’…. तिला म्हटलं ‘थांब, मी करते मस्त गरमागरम !!!!’ (कित्ती विश्वास स्वतःच्या सुगरणपणावर … :D ) तिनेही पटापट छान भजे खायचे म्हणून डोळ्यातून पाणी काढत कांदे चिरून दिले….. नंतर कांदे, मिरच्या, बेसन, तिखट, मीठ, हळद सगळं एकत्र करून ठेवलं आणि भजे तळायला घेतले पण काय बिघडलं कुणास ठाऊक प्रत्येक भजा तेलात टाकल्यावर पसरू लागला, म्हणून परत बेसन टाकलं, दोन चार फेर काढल्यावर परत त्या पिठाला पाणी सुटून परत तेच, तेलात टाकताच ते पीठ पसरू लागलं …. परत बेसन मिक्स केलं की तिखट मिठाचं प्रमाण चुके म्हणून मग परत त्यात तिखट, मीठ टाकु लागली, पण परत एक दोन फेर होतच तेच चित्र ……. अश्या प्रकारे आम्ही तशीच भजी खाल्ली कुठे तिखट जास्त तर कुठे मीठ…. :) पण भाज्यांनी काही शेवटपर्यंत दाद दिली नाही… :D

भजी तर भजी तांदळाच्या खिरीचाही तोच ताल !!!!!!!!! प्रमाण कमी जास्त होण्याची ही काही उत्तम उदाहरणे !!!!!!!!! दोन माणासंपुरती खीर करण्यासाठी मी चक्क एक वाटी तांदूळ घेतले…. थोडे जास्तच पण कमी नाही….. :) आणि व्हायचे तेच झले. कितीही दूध घातलं तरी खीर म्हणजे घट्ट गोळाच…. :D शेवटी ती घट्ट खीर रबडी सारखी खाण्यात धन्यता मनात आम्ही कशीबशी थोडी संपवली…. उरलेल्याचे काय केले हे विचारायला नको… :P

असे हे विविध खादाडीचे प्रयोग अजूनही चालूच आहेत…….. ह्यातून कधी बिघडतं तर कधी खूप छान जमूनही जातं!!!!!!! कसंही जमलं तरी नवरोबा आवडीने खातात, सामिक्षकाचेही काम करतात आणि सुधारणा सांगत सोबत करुही लागतात…. :D

ह्यावेळी सगळे बिघडलेले पदार्थ झाले ….. पुढल्या वेळी सगळे छान जमलेले पदार्थ …. नक्की…. :)

बोबडे बोल – २

सकाळी सकाळी…..मी घरकामात आहे काहीतरी… पिल्लू खेळतोय बाल्कनीत. दूडूडूडू धावत येतो माझ्याकडे आणि म्हणतो, “मम्मी.. मम्मी…, माऊ .. माऊ….”  मला नेतो बाल्कनीत….

मी विचारते त्याला “कुठेय माऊ???”….. “माऊ कुठे दिसली तुला?”.     बाल्कनीतून तो समोरच दिसणार्‍या मोठ्या झाडाच्या शेंड्याकडे बोट दाखवतो…… “झाडाच्या शेंड्यावर कुठे बसणार माऊ!!!!!!!!!”

बाजूच्यांकडे घरच्यासारखीच असणारी मांजर दिसली असेल ह्याला असा विचार करत मी परत फिरणार तोच झाडाच्या शेंड्यावर बसलेला बंदर दिसतो …… :D :D ….. माझ्या पिल्लुची माऊ !!!!!!!!!!   त्याला पटकन उचलून घेऊन आम्ही मायलेकं बघत बसतो माऊ….. आयुष्यात पहिल्यांदाच मी पण बंदर बघतेय जणू !!!!!!!!

चिरंजीवांना घेऊन शनिवारच्या संध्याकाळी निघालीय मी फिरायला….. जाताना चिउ, काऊ  माऊ, भू:भू सगळे भेटताहेत आणि चिरंजीवांची अखंड बडबड चालू आहे (चिउ काऊच्याच भाषेत…. :) ) इतक्यात जवळ आलेला भू:भू दूर जातो. मी विचारते पिल्लुला, “अरे गेला भू:भू……कुठे गेला???   भू:भू कुठे गेला???”

क्षणाचाही विलंब न करता चिरंजीवांचे उत्तर तयार , “आफिश्… ” … :)
नंतर माझा प्रश्न “माऊ कुठे गेली???” …. “आफिश्….”
“पप्पा कुठे गेले??? “….. “आफिश् …..”
“चंदामामा कुठे गेला”…… “आफिश् ……”

दृष्टीच्या टप्प्यात नसलेले सगळेच आफिसात जातात बहुतेक…….!!!!!!!!!!!!!

एका दुकानात सामान घ्यायला थांबलोय आम्ही, नवरा सामान घेत असताना एक काकू बोलताहेत लेकाशी. hello झालं, ओळख झाली, शेवटी त्या विचारतात “नाव काय तुझं? ” मीच सांगते पहिले “अथर्व”……पुढे चिरंजीव … “बम्माश आए ……”…. :D :D :D

रात्री जेवण झाल्यावर जरा पाय मोकळे करायला म्हणून निघालोय आम्ही लेकासोबत …. जाताना लेकाला मधे कडेवर, मधे पायी असं घेऊन चाललोय त्याच्या चिमण्या पावलांनी चालत आजूबाजूचं जग नव्या नजरेनी बघतोय….. आम्ही दोघं बोलत असताना मधेच चिरंजीव “पपा.. पपा…  पपा….”….पपांनी लक्ष दिल्याशिवाय आणि त्याच्याकडे बघितल्याशिवाय काही पापाचा जप थांबत नाही…… पपांनी “काय?” असं म्हणताच….. चिरंजीवांची फर्माईश… “चॉकेत ….” पपाला कोण आनंद!!!!!!!!!  पहिल्यांदाच लेकानी मागितलंय काही तरी…… माझं आइसक्रीम राहिलं बाजूला… पहिले स्वारी चॉकेत घ्यायला वळते…… :)

सकाळी सकाळी चिरंजीवाना जाग आल्यावर चड्डी बदलवण्याचा वगैरे कार्यक्रम चालू आहे… इतक्यात… ” पूकक…..” असा आवाज काढत किंचित तिरपे होत पिल्लू गोड हसतोय माझ्याकडे पाहात…. मी पण हसतेच आहे तोच चिरंजीव “पुककू नाई…..  !!!!!!” …. :D :D :D

सध्या अश्या अनेक बोबड्या बोलांसोबत युद्ध चालू आहे….. चुकत, माकत परत सुधरवत आम्ही शिकतोय…. नवीन नवीन शब्द कळताहेत….. एकदा का व्यवस्थित बोलता यायला लागलं कि मात्र हे बोबडे बोल ऐकायला कान तरसतील….. तेव्हा हे बोबडे बोलच सोबत करतील…. त्यासाठीच हा सगळा  खटाटोप…. :)

सुखावणारी गाणी…

कधी असंच जुने, खास करून कॉलेजच्या वेळेसचे गाणे ऐकून वाटतं….. मस्त होते ते दिवस, आपले फुलपाखराचे होते, अनेक स्वप्नं होती, स्वप्नातला राजकुमार कोण हे माहित नव्हते आणि तो कोण असेल ह्यावर विचार करण्यात, त्याला imagine करण्यात पण खूप मज़ा होती….. धुंदी होती……..

आता ऑफीस मधे बसल्या बसल्याच कुणी तरी लावलेलं गाणं ऐकू येतय…

चाँद ने कुछ कहा, रात ने कुछ सुना, तू भी सुन बेखबरssss प्यार कर…. ओहोहोहो… प्यार करssssss

त्यावेळी हे गाणं ऐकताना पण प्रत्येक मुलगी स्वतःला मधुरी दिक्षित च्या जागी consider करत valentine च्या रात्री नक्की आपला शाहरूख भेटेल अशी आशा मनात ठेवून असते ??????

मी कॉलेज ला असताना अशीच खूप गाजलेली, वाजवून वाजवून गुळगुळीत झालेली कॅसेट म्हणजे “मोहब्बतें…” . आताही कधी त्या पिक्चरचे गाणे ऐकताना कॉलेजचे दिवस परत आल्यासारखे वाटतात….. कॉलेजच्या ट्रीप मधे केलेली धमाल आठवते….. मैत्रिणिने ह्या पिक्चरच्या गाण्यावर केलेला डान्स आठवतो….. :)

नुसती हि गाणी लागली तरी किती तरी आठवणी ताज्या होतात…. :)

मैत्रिणीच्या रूम वर तास न् तास बसून पीसी वर बघितलेलं एकच एक गाणं म्हणजे
“रंग रंग मेरे रंग रंग मे रंग जाएगी तू रंग, संग संग मेरे संग संग मे संग आएगी संग……….”
…….एकदा ऐकून….नव्हे बघून तर बघा हे गाणं…. मस्तच….. आपल्या जोडीदाराला सतत गर्दीत बघत राहणारी ती आणि गर्दितही सतत तिला शोधणारा तो आपल्याला आपल्या साखरपुडा आणि लग्नाच्या मधल्या काळाची आठवण करून देतो…….. :)

अशीच आणखी काही गाणी म्हणजे DDLJ ची गाणी, “तुझे देखा तो ये जाणा सनम….. ” अगदी evergreen ………. कधीही ऐका तितकंच फ्रेश वाटतं……

रात्री धाब्यावर वगैरे बस थांबली असताना, तिथल्याच एखाद्या पानठेल्यावर कधीही न ऐकलेले न गाजलेले गाणे चालू असतात… पण ती वेळच अशी असते नं की ते गाणे पण मस्त वाटतात…. तो मौसमच तसा असतो….. हिवाळा असेल तर थंडीत आणि नसेल तरीही रात्रीच्या त्या गारव्यात ती गाणी आपल्याला छानच वाटतात

जुनी गाणी तर सदाच evergreen …. . आणि बाहेर पाऊस चालू असताना गाडीच्या खिडकीतून अंगावर तुषार घेत जुने गाणे ऐकण्याची लज्जतच काही और!!!!!!!!!! गाण्यात पूर्णपणे समरस होऊन त्याच्या शब्दांचा आस्वाद घेत गाणं ऐकलं नं की गाणं पण कळत …. खरंच ….. ते आपलं वाटायला लागतं ….

माझा स्वतःचा असा अनुभव आहे की स्वतः लावलेल्या आवडीच्या गाण्यापेक्षा, surprisingly अचानकपणे कानावर पडलेलं आवडीचं गाणं ऐकण्यात जास्त मजा येते !!!!!!!!!! surprise माणसाला आवडतंच………कसही असलं तरी… :)

असंच आज surprisingly  “चाँद ने कुछ कहा, रात ने कुछ सुना…..” हे गाणं कानावर पडलं आणि वळवाच्या पावसासारखी ही पोस्ट तयार झाली ….. :D

नि:शब्द

त्याला पाहून वेडीच झाली ती…. आजच तर पहिल्यांदा पाहिलं त्याला….. सकाळीच…. वर्गात शिरताना दरवाजातच त्याला धडकणार होती ती. पण थोडक्यात वाचली आणि का वाचली ही हळहळ तिला नंतर होत राहिली. लाल रंगाचा आडव्या लाइनिंग चा शाहरूख ने DDLJ मधे घातला होता तसला T-Shirt , तश्याच फोल्ड केलेल्या बाह्या, चेहऱ्यावर एक मिश्किल हास्य, तिला आवडणारा ना गोरा ना काळा असा गहू वर्ण आणि आहे त्याच स्मार्टनेस मधे अजुन भर घालणारा चस्मा…. तिला स्वप्नातला राजकुमारच वाटला तो.  पहिल्याच भेटीत प्रेमात पडली ती त्याच्या…

तिच्याच वर्गात आला होता तो….  नवीनच अडमिशन  आहे हे तिला नंतर कळले.  काय बरं त्याचं नाव… हं…. प्रतीक….  असंच तर सांगितलं मैत्रिणिने.  नावही किती छान आहे, तिच्या प्रेमाचं ‘प्रतीक’… स्वतःशीच खुश झाली ती…  त्याची प्रत्येकच गोष्ट तिला छान वाटायला लागली. तिच्या मनात तो घर करून गेला.

दुसऱ्या दिवशी तर तिला कधी एकदा कॉलेजला जाते आणि कधी त्याला परत एकदा पाहते असं झालं होतं. खरंच कुणाला नुसतं पाहून, पहिल्याच भेटीत आपण प्रेमात पडू शकतो ह्यावर तिचा विश्वासच बसेना, पण असं झालं होतं खरं. आता कोणी त्याला crush म्हणो, attraction  म्हणो…. तिला पर्वा नव्हती !!!!!!!!

आजची सकाळ पण मस्त उगवली होती. तिला जाग आली तीच मुळी कोकिळेच्या आवाजानी, तिच्या खोलीच्या खिडकीतून तिने बाहेर पाहिलं तर मस्त रिमझिम पाऊस  पडत होता, आणि अंगणातली फुलं वार्‍यवर डोलत होती. तिने तो ओला, हवाहवासा सुगंध आपल्या श्वासात भरून घेतला. तिला परत एकदा त्याची पहिली भेट आठवली. काल त्या भेटीनंतर वर्गात पण तिचं काही लक्ष नव्हतं. सर काय सांगताहेत सगळं तिच्या डोक्यावरून जात होतं आणि नजर सतत त्याच्याकडे वळत होती. मुलांच्या रांगेत तो दुसऱ्याच बेंचवर काठावर बसला होता, त्याच्या हालचाली सहज टिपता येत होत्या आणि त्या टिपायची एकही संधी ती सोडत नव्हती. त्याच्या हालचालींना पण एक प्रकारचा स्मार्टनेस होता… कि तिला तो उगीचच जाणवत होता !!!!!!!!!!!! त्याची बसायची स्टाइल, लिहायची स्टाइल, सरांनी काही विचारलं तर उत्तर देण्याची स्टाइल….”वैजू…. ए……  वैजू…… उठायचं नाही का आज!!!!!  ८ वाजत आले !!!!!” आईच्या हाकेने तिची तंद्री भंग पावली.

“कॉलेज ला जाताना दांडेकर काकूंकडे निरोप देऊन जा….. संध्याकाळी भीसी आहे म्हणावं आमच्याकडे. नक्की या… आणि तू पण लवकर ये आज कॉलेजमधून”

आईची टेप पुढे चालूच होती… तिने एक मोठ्ठा आळस दिला. ही आई पण ना…आकाशातुन सरळ जमिनीवरच आणते…… जाऊ दे…… मला पण नाहीतरी आज लवकरच जायचय कॉलेजला, त्या प्रतीकशी ओळख करायची आहे असा विचार करतच ती उठली.

आज कॉलेजची तयारी करताना पण एक वेगळाच उत्साह होता तिच्यात. आपला सगळ्यात आवडता गुलाबी रंगाचा ड्रेस घातला तिने, तिच्या गोऱ्यापान वर्णाला तो खूपच खुलून दिसत होता. आपल्या घनदाट कुरळ्या केसांना बो मध्ये एकत्र बांधले, एका हातात घड्याळ आणि एका हातात गुलाबी रंगाचंच मॅचिंग ब्रेस्लेट घातलं. कानातले पण गुलाबी रंगाचे. ती गुलाबीच होऊन गेली होती आज…. आरश्यातील आपल्या छबीकडे बघून ती स्वतःशीच लाजली….

जाताना आईने परत एकदा दांडेकर काकूंकडे जायची आठवण करून दिली.

पहिले दांडेकर ककूंकडे जायचा तिला सर्वस्वी कंटाळा आला होता. तिला आधीच कॉलेज गाठायची घाई झाली होती. पण रस्त्यातच त्यांचे घर होते आणि आईचा निरोप देणे भाग होते.

तिने काकूंच्या घरी बाहेर अंगणात गाडी लावली व त्यांना निरोप देऊन बाहेर आली, तोच तिला समोर तो रस्त्यावरून जाताना दिसला…. कॉलेजलाच चालला होता बहुतेक…. त्याला बघुनच ती शहारली… मोहरून गेली … गालावर नकळत लाली पसरली…. त्याच्याशी बोलण्याची अनावर इच्छा मनात तरळून गेली…..

पायीच चालला होता तो…. आणि ती तिच्या स्कूटीवर !!!!!!!!!! कशाला हव्यात गाड्या न घोड्या कॉलेजला जायला, आईचे वाक्य तंतोतंत पटले तिला. स्कूटी इथेच ठेऊन पायीच निघावे असही वाटून गेलं….क्षणभर….. पण मग ती त्याचे काय कारण सांगणार होती …. शेवटी नाइलाजाने तिने गाडी स्टार्ट करायला घेतली….. पण छे!!!!!!!!!! ती सुरुच होईना…… तिला गाडी सुरू न होण्याचा इतका आनंद कधीच झाला नसेल……चार पाचदा किक मारून पण काहीच फायदा झाला नाही. तितक्यात काकु बाहेर आल्या आणि तिला विचारू लागल्या, “गाडी सुरू होत नाहीए का???” तिने नाही म्हणताच त्या म्हणाल्या “थांब मी बोलावते कोणाला तरी.”

आणि…… त्यांनी चक्क रस्त्यावरून जाणार्‍या त्यालाच बोलावलं, “गाडी सुरू होत नाहीए…… बघता का जरा ????”

तिचे दांडेकर काकुंवरचे प्रेम उफाळून आले….  त्यांनाच मिठीत घ्यायची इच्छा झाली तिला. मनातला आनंद चेहऱ्यावर दिसू न देता तिने एकदा त्याच्याकडे पाहिले… तो पण धीटपणे तिच्याचकडे बघत होता, त्या छोट्या गावात मुलं मान  वर करून पण मुलींकडे पहात नसताना त्याच्या नजरेतली धिटाई तिला आवडून गेली……

तो आला … जवळ…. अगदी जवळ….. तिच्या पासून फार तर हातभर अंतरावर उभा होता तो. तिने बघितले त्याच्याकडे….. पण तिला बोलायला काही सुचलेच नाही. ती फक्त बघतच राहिली, शेवटी तोच म्हणाला, “मी बघू का सुरू करून???”

त्याच्या ह्या प्रश्नाने भानावर येत केविलवाणे हसत तिने गाडीच्या हॅंडल वरचा हात काढला आणि त्याने ते हॅंडल पकडले, हे करताना झालेला हाताचा ओझरता स्पर्श तिच्या अंगभर मोरपीस फिरवून गेला….. इतक्या जवळून त्याला दुसर्यांदा बघताना, त्याच्या इतक्या जवळ उभे असताना तिला खूप छान वाटत होते…. हे क्षण संपूच नये …… असे तिला न वाटले तर नवलच !!!!!!!!!!!!

त्याने पण दोन-चार किका मारल्या तरी गाडी चालू व्हायचे नाव घेईना… थोडा वेळ प्रयत्न करून तो म्हणाला “इथे जवळच एक गेरेज आहे. तिथपर्यंत ढकलत घेऊन जाऊ आणि त्यालाच चालू करून मागू ???? “. तिचा होकार गृहीत धरूनच त्याने गाडी ढकलायला सुरूवात पण केली. तिला खरतर म्हणायचे होते,  “नको नेईन मी, तुम्हाला कशाला उगाच त्रास!!!!!”  पण काही न बोलताच ती त्याच्या मागोमाग चालू लागली.

कोणीच कोणासोबत बोलेना. थोडं पुढे गेल्यावर तो म्हणाला तिला, “तुम्ही S. R. S. College मधे सेकंड इयर लाच शिकता नं? ” तिने मानेनेच होकार दिला. “मी बघितलं काल तुम्हाला….” तोच पुढे म्हणाला.

“तू  म्हटलं तरी चालेल. आपण एकाच वर्गात आहोत ” ती कशीबशी म्हणाली. तो मंद हसला फक्त आणि म्हणाला,

“मला काही नोट्स हव्या होत्या. मी थोडी उशीरच अडमिशन   घेतलीय”

ती हो म्हणणारच तोच समोरून येणाऱ्या एका मुलीकडे बघून तो हसून  “hi …” म्हणाला .

त्या मुलीच्या डोळ्यात बघत खूप प्रेमाने विचारलं त्याने “कशी आहेस?”

ती पण त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली “कशी असणार तुझ्याशिवाय !!!!!! कित्ती दिवस लावले इथे यायला” तो फक्त हसला…आणि त्या दोघींची ओळख करून देत म्हणाला, “प्रणाली , ही….” आणि त्याच्या लक्षात आले की आपण नावच विचारले नाही हिला….. त्याने प्रश्नार्थक  नजरेने वैजुकडे पहिले…… कसनुसं हसत ती म्हणाली….”वैजू….”

“हं… वैजू !!!!!  आम्ही दोघं एकाच वर्गात आहोत. आताच ओळख झाली आमची. आणि वैजू ही प्रणाली… माझी मैत्रीण…. अगदी जीवभावाची मैत्रीण !!!!!! आधी आम्ही एकाच कॉलेजला होतो. मग हिच्या वडिलांची बदली इथे झाली म्हणून मग मी पण इथे अडमिशन ट्रान्स्फर करून घेतली…..” तो पुढे बोलतच होता……..

मात्र तिच्या कानात काही शिरत नव्हते….. उगाच पापण्यांची उघडझाप करत डोळ्यात आलेले पाणी परतवण्याचा ती प्रयत्न करत होती….. कळी उमलायच्या आधीच मिटून गेली होती…… तिच्या स्वप्नातला राजकुमार तिच्यापासून दूर दूर चालला होता…… तिचे प्रेम व्यक्त व्हायच्या आधीच नि:शब्द झाले  होते………

विश्वास

संध्याकाळची ७-७:३० ची वेळ…. मी स्वयंपाक करतेय किचन मधे…. समोर माझा सव्वा वर्षाचा लेक आणि त्याचे आजी आजोबा खेळताहेत. खेळता खेळता अचानक लेकाला बॅट आठवली. ‘बॅथ… बॅथ…. ‘ लेकानी एकच जप चालू केला. आजोबा उठले….. सगळ्या खोल्यांमधे शोधून आले कुठे बॅट सापडतेय का ते शोधायला???? कुठेच नाही सापडली !!!!!!!!!!!!

आजी विचारतेय लेकाला  ‘कुठे टाकलीस तू बॅट ?’

‘बघ….. ह्या सोफ्याखाली आहे का?’

मी डोकावून पहिले एकदा हॉल मधे…. लेक पण लगेच आजीची आज्ञा शीरसावन्द्या मानून वाकला खाली बॅट शोधायला….. तरी दिसेना!!!!! शेवटी पालथा होऊन, झोपून वाकून वाकून पाहत आजीला म्हणाला
‘बॅथ आए…..’

लेकाने असं म्हणायचाच अवकाश आजीनी लगेच आजोबांना रिपोर्ट केला, “हा सांगतोय बघा… सोफ्याखाली आहे बॅट !!!!!”

आजोबा पण आले सोफ्याखाली बॅट शोधायला.

मी किचन मधून ऐकतेय हा सगळा संवाद. मला हसूच फुटले, सव्वा वर्षाचा हा पोर ह्याला दिसली असेल नसेल तरी त्याचा फक्त बॅटचा जप चालू आहे. तरी आजीला किती विश्वास त्याच्यावर….. आणि आजोबा पण लगेच सोफ्याखाली बॅट शोधायला लागले !!!!!!!!

पण लेकानी आजी आजोबांचा विश्वास सार्थ ठरवला….. आणि बॅट सापडली सोफ्याखालीच….. :) :)

अधिक-उणे

आज ती ऑफिसला निघाली होती आठ महिन्याच्या दीर्घ रजेनंतर… गेल्या आठ महिन्यातल्या अनेक अनुभवांनी समृद्ध झालेली….. आई झालेली. मनात घालमेल होती, पहिल्यांदाच तान्हुल्याला सोडून जाताना मनावर दडपण आले होते. सकाळपासूनच मन बेचैन होते. सकाळची बाकी कामं आटपते न आटपते तोच त्याची तेल मालिश करणारी बाई आली. तिच्याकडून त्याचं सगळं करून घेऊन, त्याला दूध पाजून झोपवून ती जायला तयार झाली. जाताना एकदा त्याच्या कडे बघितलं… निर्धास्त होऊन तो पाळण्यात झोपला होता, मधेच हसत होता… आई आजूबाजूला असल्याच्या जाणिवेनेच त्याला सुरक्षित वाटत होते… निश्चितच….तिला वाटले आता हा उठल्यार आपण नसू !!!!! गेल्या आठ महिन्यात असे प्रथमच होईल. उठल्या उठल्या मला पहायची सवय असलेल्या ह्याला माझ्या अभावी ह्या जगात पोरके वाटेल का???? त्याला मिळत असलेल्या माझ्या मायेच्या सावालीपेक्षाहि मला मिळणाऱ्या त्याच्या त्या लुसलुशीत स्पर्शाची मी खूप मोठी किंमत देतेय….. नक्कीच !!!!!!!!

आज रविवार, सुट्टीचा हक्काचा दिवस….. संपूर्ण दिवस फक्त पिल्लुचा…. त्याच्या साठीचा. पण म्हणून बाकी घरातली कामं थोडीच सुटलीय. तिला सुट्टी म्हणून बाकीच्यांच्या आरामाचा दिवस…… तिला कधी सुट्टी ????? स्वयंपाकाचं आवरता आवरताच १२ वाजले आणि पिल्लुचा आवाज आला. पाळण्यातूनच स्वारी आवाज देत होती. पटकन हात धुवून ती पळालीच जवळ जवळ त्याला घ्यायला….. त्याला घेऊन हॉल मध्ये आली आणि त्याला भूक लागली असेल म्हणून परत स्वयंपाकघरात वळली त्याचं करायला… तर…. तोच आजीकडे गेला रडत रडत भूक लागली म्हणून !!!!! ती बिचारी झाली अगदी…. डोळ्यात आलेलं पाणी लपवत असतानाच आपण काय गमावलं ह्याची जाणीव झाली तिला !!!!!!!

उद्या खूप महत्वाची मीटिंग होती तिची… Client  Visit, आणि ती लीड असल्यामुळे सगळी जबबदारी तीचीच होती. रात्री झोपतानाच सकाळी लवकर उठून आटपून लवकरच निघावे थोडे तिने ठरवलं होतं. काही कामं पण उरकायची होती. पिल्लुच्या रडण्याने रात्री जाग आली. त्याला भूक लागली असेल म्हणून तिने जवळ घेतले तर बापरे आंग चांगलंच गरम होतं… १०० च्या वर ताप होता. रात्री दिलेल्या औषधांनी तात्पुरता ताप उतरला तरी सकाळी परत चढलाच. रजा घेणं शक्यच नव्हतं. परत तीच जीवाची घालमेल….. सगळंच मन इकडे पण खांद्यावरची जबबदारी कशी झटकता येईल???? शेवटी आपल्या हृदयाच्या तुकड्याला नवरा आणि सासुच्या जबाबदारीवर सोडून ती निघाली. मी ऑफीस मधून फोन करेन डॉक्टर कडे लगेच न्या असं सांगायला विसरली नाही पण आयुष्यातून खूप मोठे काही निसटत होते, ज्याची जाणीव निश्चितच होती पण ती हतबल होती (???????????????)

आज त्याचा शाळेचा पहिला दिवस, भारंभार डोनेशन देऊन ह्या चांगल्या शाळेत अडमिशन मिळवली. शाळेचा पहिलाच दिवस म्हणून तिने खास सुट्टी घेतली. आपल्याला भुर्ररsss जायचं आहे, मी तुला  चॉकलेट देईल, तिथे तुला खेळायला छान मित्रमैत्रिणी मिळतील असं त्याला सांगत तिने त्याला तयार केलं. त्याला घेऊन शाळेत आली पण तो राहायालाच तयार नाही. ती डोळ्यासमोरून जाताच जोरजोरात रडायला सुरूवात केली. शेवटी तिला शाळा सुटेपर्यंत २-३ तास तिथेच त्याच्या सोबत थांबावं लागलं आणि त्याला घेउनच ती परत आली. पण दुसऱ्या दिवशी काय????? तिला रोज रोज सुट्टी घेणं थोडीच शक्य होतं. म्हणून मग नवरा आणि सासू गेले त्याच्या सोबत. नंतर नवरा ऑफीसला निघून जाऊन  सासू थांबली २-३ तास… असंच पुढे १५ दिवस….. आपल्याच पिल्लूच्या सहवासातले सोनेरी क्षण आपण गमावतोय का ?????

आता तिचा लेक चार वर्षाचा झाला होता. शाळेतही जायला लागला होता आणि सध्या दिवाळीच्या सुट्ट्या होत्या. घरी पाहुणे होते, नंदा, जावा दिवाळीनिमित्य आल्या होत्या. दिवाळी संपून दोन चार दिवस राहायचा त्यांचा प्लान होता. पण ती गेलीच ऑफीसला दिवाळी संपताच. बांधील होतीच शेवटी ती. संध्याकाळी घरी परत आल्यावर पिल्लुला पाहताच आपले सगळे कष्ट विसरून तिने जवळ घेतले त्याला. तर तिच्या कुशीत शिरत तो म्हणाला तिला “तूच का जातेस ग आई ऑफीसला. चिनू -मनुची आई कशी घरीच असते  !!!!!!!!!!! मला कित्त्ती आठवण आली तुझी माहितेय???? ” तिला गलबलून आले. त्याला आपल्या मिठीत घेऊन ती मूकपने रडत राहिली… आणि त्यातून निसटून खेळायला जायचा तो प्रयत्न करत राहिला !!!!!!!!!!!

शिवथरघळ

पुण्याच्या आजूबाजूला फिरायला कुठे जायचं हा आताशा प्रश्नच असतो. एक तर बरीच ठिकाणं पाहून झाली आहेत. दुसरं आणि मुख्य कारण म्हणजे weekend ला सगळीकडे असलेली प्रचंड गर्दी. सिंहगड, लोणावळा, खंडाळा इथे तर जत्रा भरल्यासारखी गर्दी असते आणि त्यातून परत ट्रॅफिक मधेच इतका वेळ जातो की तिथे जाणच नको वाटतं. शेवटी ह्या वेळेस आम्ही शिवथरघळ इथे वन डे पिकनिक साठी जायचं ठरवलं.

शिवथरघळ इथे रामदास स्वामिनी दासबोध लिहिला होता. वरून धबधबा आणि त्याखाली छोटीशी गुहा असे त्याचे स्वरूप आहे. हे ठिकाण पुण्यापासून अंदाजे १२० किमी दूर आहे. सातारा रोड वर भोर कडे जाणारा रस्ता पकडून पुढे महाड रोड ला लागायचं. भोर पासून साधारण ही घळ  ५७ किमी दूर आहे पण पहिले १३ किमी सोडले तर पुढे जवळपास घाटाचाच रस्ता आहे. आणि फारशी गर्दी नसल्यामुळे आपलीच गाडी राजेशाही थाटात जाते. रस्त्यात बरेच छोटे मोठे धबधबे आणि नदी सोबतीला असते.

घळीच्या आधी साधारण १०-१५ किमी आधी एक खिंड लागते, तिथले निसर्ग सौंदर्य तर अवर्णनीय. त्या वळणावरच काही चहा, भजीच्या टपऱ्या आहेत. ढगांनी वेढलेल्या ठिकाणी वरुन पडणाऱ्या भूरभूर पावसात गरमागरम भजी आणि चहाची लज्जतच न्यारी!!!!!!

इथून पुढे गेलं की महाड रस्ता सोडून उजव्या हाताला शिवथरघळ साठीचं मोठं प्रवेशद्वार दिसतं. तिथून साधारण ६ किमी आत जावं लागतं. हा रस्ता दोन्ही बाजूने हिरव्या जर्द झाडीने वेढलेला आहे. आणि खाली उतरत घळीच्या जवळ असलेया छोट्या गावात तो जातो.

ऐन पावसाळ्यात जर खूप पाऊस झाला असेल तर ह्या गुहेवरून पण पाणी पडतं आणि आत जाण्यासाठी भिजतच जावं लागतं असं इथले लोक सांगतात  मात्र आम्ही गेलो तेव्हा जास्त पाऊस नसल्यामुळे छोटासाच धबधबा होता. सध्या तरी विना गर्दीचं शांतता अनुभवण्याच हे ठिकाण आहे.

Follow

Get every new post delivered to your Inbox.